शनिवार, २२ जुलै, २०२३

सुरगड

सुरगड 


मुंबई - गोवा महामार्गावरील नागोठणे च्या पुढे १३ किमीवर खांब गावातून डावीकडे जाणारा रस्ता वैजनाथ मार्गे घेरासुरगड या किल्ल्याच्या पायथ्याच्या गावात पोहचतो. गावातील मारुती मंदिरात १५ ते २० जणांसाठी झोपण्याची, तसेच गावात आधीच संपर्क केला तर राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था होऊ शकते.
मारुती मंदिराच्या बाजूने एक वाट जंगलातून गडाच्या दिशेने जाते. गडावर गड संवर्धन करणाऱ्या संस्था आणि गिर्यारोहकांची ये-जा असल्याने पायवाट अतिशय ठळक व मळलेली असून चुकण्याची अजिबात शक्यता नाही. पायवाटेने मार्गक्रमण करत राहिल्यास थोडं पुढे गेल्यास ओढा ओलांडून डाव्या बाजूला एक विहीर लागते. अजून थोडं पुढे गेल्यास चढण चडाईला सुरवात होते. चडण चढली की आपण पठारावर पोहोचता येते.


ह्या पठारावर काही अंतर चालून गेल्यावर अणसाई देवीच्या मंदिराकडे जाणारा एक फलक लावलेला दिसतो. या मार्गाने काही यानंतर चालून गेल्यावर आपण अणसाई मंदिराजवळ पोचतो. मंदिरात देवीची मूर्ती तसेच अजूनही काही मूर्ती आढळून येतात. या इथे एक शिवकालीन तोफ देखील पाहायला मिळते. हे पाहून पुन्हा याच वाटेने मागे यावे जेथे फलक आहे तेथूनच एक वाट गडाच्या दिशेने वर जाते.



पठारावरून डाव्या बाजूच्या पायवाटेने साधारणपणे तासभर चढल्या नंतर आपण घळीत येवून पोहोचतो. येथे उजव्या बाजूला कातळाच्या पोटात एक पाण्याच टाक असून तेथे एक भुयार आहे. या पाण्याच्या टाक्यात सोडलेली काठी गडावर असलेल्या गुहेतील पाण्याच्या टाक्यात २ दिवसा नंतर पाहायला मिळते असे गावकर्‍यांचे म्हणणे आहे. हे पाहून पुन्हा घळीत यावे आणि वर चढण्यास सुरवात करावी.



घळीतून वर चढताना घळीच्या टोकाला थोडस वरच्या बाजूस एक भुयार आहे हाच पूर्वीच्या काळातील राजमार्ग आहे. जो इंग्रजांच्या काळात उध्वस्त करण्यात आला होता. थोड पुन्हा खाली येऊन उजव्या बाजूने कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. आणि काही गडप्रेमिनी गडावर सहज जाण्यासाठी एक दोरखंड लावलेला आहे. ह्या दोरखंडच्या सहयाने आपण कातळ टप्पा पर करून घळीच्या वरच्या बाजूस पोहचतो. अजून काही अंतर घळीतून वर गेल्यावर आपण प्रवेशद्वारातून गडावर पोचतो.









येथे उजव्या बाजूला एक हनुमानाची मुर्ती आहे. मिशी आणि़ कमरेला खंजीर असलेली ही हनुमानाची मूर्ती असून त्याने पायाखाली पनवती राक्षसीणीला चिरडलेले आहे. हनुमानाचे शेपूट माथ्यावर आहे. उजव्या दिशेने पुढे गेल्यास सुरगड माचीवर आपला प्रवेश होतो. माचीवरून ढोलवाल धरण, कुंडलिका नदीच पात्र आणि घनदाट अरण्य असे विहंगम दृश्य पाहायला मिळते. याच माची वरून घोसाळगड आणि अवचितगड दिसतात तर विरुद्ध दिशेला मिर्‍या डोंगर / मिरगड पाहायला मिळतात. या माची वरून वाट उतरताना एक पाण्याचं टाक दिसत. हे पाहून आपण पुन्हा हनुमनाच्या मूर्ती जवळ यावे आणि मूर्ती समोरील वाटेवरून गडमाथ्यावर जाण्यास वाट आहे येथून वर जाण्यास सुरवात करावी.






वर चढताना  जोत्यांचे अवशेष पाहायला मिळतात. वर चढल्यावर डाव्या बाजूला कोठार आणि पडलेलं हेमाडपंथी मंदिर असून मंदिरात महादेवाची पिंड आणि भैरव आणि भैरवीची मूर्ती पाहायला मिळते. पुढे चालत गेल्यास दगडांची गोमुखी रचना पाहायला मिळते आणि ५ मिनिटे पुढे गेल्यास उजव्या बाजूला हेमाडपंथी मंदिराचे दगड वापरुन बनवलेले दगडी सिहांसन दिसते. 















त्याच दिशेला पुढे एकमेकांना लागून असलेली ५ पाण्याची टाकी दिसतात (हा गडावरील पाण्याचा मुख्य स्त्रोत आहे).येथूनच पुढे डाव्या बाजूला सदर असून तिची कालौघात पडझड झालेली आढळते. उजव्या दिशेला चौथरा असून गवातांमुळे तो झाकला गेला आहे.
सदरेच्या उजवीकडे खाली उतरून गेल्यावर ३ टाके आहेत.गुहा टाक्यात दोन खांब आहेत. परत वरच्या दिशेला आल्यावर सदरे समोरील वाटेने गेल्यावर डाव्या बाजूला सुकलेलं पाण्याचं टाक आहे. तेथुनच पुढे चालत गेल्यास डाव्या बाजूला चौथरा असून उजव्या दिशेला बुरुज आहे. खाली उतरल्यावर उजव्या बाजूला शिलालेख असून त्यावर २ भाषांमध्ये माहिती कोरलेली आहे, वरच्या बाजूला अरबी भाषेत ज्या ओळी लिहिल्या आहेत त्याचच भाषांतर खाली देवनागरी मध्ये केलेलं आहे. या शिलालेखातून आपल्याला किल्ल्याच्या बांधणीची आणि किल्लेदाराची माहिती मिळते. पुढे शेवटचा ढालकाठी असलेला बुरुज असून खाली पाण्याच टाक आहे. पुढच्या उंचवट्या वर समाधी पाहायला मिळते पण ती कुणाची आहे याची नोंद नाही. पुढे पायवाटेने आणि जंगलातील मार्गाने खाली उतरल्यास तासाभरातच आपण चढून आलेल्या पठारावर पोहचतो आणि तेथून आलेल्या मार्गानेच गावात पोहोचावे. या मार्गावर एक तोफ आहे. पण ती शोधावी लागते. हा गडाचा चोरमार्ग आहे. परंतु ह्या वाटेने साहस कोणी जात नसल्याने आपण आल्या मार्गाने गड उतरण्यास सुरवात करावी.






































|| हर हर महादेव ||
|| जय भवानी ||
|| जय जिजाऊ ||
|| जय शिवराय ||
|| जय शंभूराजे ||